मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुरुवातीला राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला त्यानंतर त्यात वाढ 1 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगतलं.
तसंच निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.