BREAKING NEWS : कैलास नगर मधील देशी परवानाधारक दारू दुकान सील

0
81

चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी
विभागाची कारवाई
• यवतमाळ जिल्ह्यातून सुरू होती चंद्रपूर जिल्ह्यात देशी
दारूची तस्करी
• पाच वर्षातील पहिलीच अबकारी विभागाची मोठी
कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातून सर्रासपणे अवैधरित्या दारू तस्करी होत असल्याच्या कारणावरून वणी तालुक्यातील कैलास नगर येथील परवानाधारक देशी दारूचे दुकान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करून सील केले आहे. ही कारवाई आज शुक्रवारी 5 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ च्या सुमारास करण्यात आली आहे. या खळबळजनक कारवाईमुळे दारू तस्करी करणार्‍यांना धडकी भरली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत घुग्घुस पासून दहा किलोमीटर अंतरावर कैलास नगर गाव आहे. येथे मंदाताई कळसे यांच्या मालकीचे परवाना धारक देशी दारूचे दुकान आहे. आज शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून सदर परवानाधारक दुकानाला सील केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील एखाद्या परवानाधारक दुकानावर कारवाई करून दुकान सील करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. काल गुरुवारी याच देशी दारू दुकानांमधून दोनशे पेटी देशी दारू चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा येथे तस्करी होत असताना पकडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यवतमाळचे पोलीस अधीक्षकांना तस्करी बाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर यवतमाळचे पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दारू तस्करी सक्तीने रोखण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवरच कैलास नगर येथे परवानाधारक देशी दारूच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशी दारूची तस्करी करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरलेली आहे.

युती शासनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदी नंतरही चंद्रपूर सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची तस्करी सुरू असल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात येत असलेले दारूने भरलेले ट्रक पकडून अवैधरित्या होत असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला होता. सोबतच राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारू तस्करीला रोखण्याकरिता कडक पावले उचलण्याची विनंती केली होती. तर पोलिस अधीक्षकांना भेटून दारू तस्करी रोखण्याच्या सुचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या विभागाचे अबकारी विभागाचे अधिकारी दारू तस्करी रोखण्याकरिता सक्रिय झाले आहेत.

आज शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाचे अधिकाऱ्यांसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कैलास नगर मध्ये जाऊन केलेली संयुक्त कारवाई हे त्याचे धोतक आहे. या कारवाईमुळे दारू तस्करी होत असलेल्या परवानाधारक दुकानदारांमध्येही खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here