कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महराष्ट्रात बंद करण्यात आलेली मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, अकारण गर्दी करू नये हे आवाहन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2021
कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.