संतप्त कोरोना योद्धांची मेडिकल कॉलेजमध्ये तोडफोड

0
444
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• महिला कामगार हातात दंडुके घेत अधिष्ठाता कार्यालयात धडकले
• जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन चिघळले

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पंचवीस दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्या कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचे थकित पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या डेरा आंदोलनाने आज शुक्रवारी (५ मार्च २०२१) हिंसक वळण घेतले. दोन दिवसापूर्वी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन कायदेशीर व शांततेच्या मार्गाने कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता.आज देशमुख यांच्या नेतृत्वात संतप्त कामगारांनी मेडिकल कॉलेजमधील अधिष्ठाता कार्यालयातील काचांची तोडफोड करून ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन केले.

आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान देशमुख यांच्या नेतृत्वात जुना वरोरा नाका चौक येथून जनविकासचे कार्यकर्ते दंड्याला बांधलेले झाडू हातात घेऊन नारेबाजी करीत मेडिकल कॉलेज च्या दिशेने निघाले.सर्व आंदोलनकर्ते मेडिकल कॉलेजच्या आवारात घुसल्यानंतर थेट अधिष्ठाता कार्यालयात घुसले. याची चाहूल लागताच अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांनी आपल्या कार्यालयातून पळ काढला.यानंतर अधिष्ठाता कार्यालयात कामगारांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यालयातील काचांची तोडफोड करण्यात आली.
…तर जनविकास सेना कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ‘दंडा लेकर हल्ला बोल’ करणार

जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सर्वच ठिकाणी शासकीय अधिकारी कंत्राटदाराशी संगनमत करून कंत्राटी कामगारांचे शोषण करतात. कमी वेतनामध्ये जास्त काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमानुसार व वेळेवर पगार देण्यात नाही.कायद्यानुसार हक्क मागणाऱ्या कामगारांना कामावरून काढण्यात येते.कंत्राटी कामगारांना गुलामासारखी वागणूक देण्यात येते. लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी कंत्राटी कामगारांच्या वेतनातून कमिशन घेतात.कंत्राटी कामगार कमी वेतना मध्ये जास्त काम करतात,ते आराम व भ्रष्टाचार करित नाहीत.देश व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान जास्त महत्त्वपूर्ण असल्यामुळे अशा कंत्राटी कामगारांचा अपमान यापुढे सहन करणार नाही तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी आधी ‘कलम-कानून- कागज लेकर हल्ला बोल’ आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिष्ठाता कार्यालया प्रमाणे प्रत्येक शासकीय विभागात ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिलेला आहे.