महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 32,29,547 वर गेली आहे. राज्यात गुरुवारी (8 एप्रिल) कोरोनाचे 56,286 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32,29,547 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतच्या गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.
आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी
राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.