धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेत कोंबले २२ रुग्णांचे मृतदेह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बीड : जिल्ह्यात एक अतिशय महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून १-२ नव्हे तर तब्बल २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळं मरण पावलेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्यानं रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्यानं मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावं लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.

रुग्णालयात फक्त दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता ५ अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. १७ मार्चला जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणतीही हालचाल त्यासाठी झालेली दिसत नाही, असं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. रुग्णावाहिका नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून, स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अंबाजोगाई तालुक्यात तर स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे रामानंद तिर्थ रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. शेजारील तालुक्यातील रुग्णही स्वारातील रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव कोरोना सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे.