डेरा आंदोलनातील कोविड योध्द्यांचा चौकशी समितीला घेराव

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दोन कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने आंदोलक संतप्त

चंद्रपूर : रुग्णालयात सिझर वार्ड मध्ये काम करणारी कक्षसेविका आशा वैद्य यांचे पती किशोर वैद्य (वय 48) तसेच सफाई कामगार म्हणून कार्यरत भोजराज शेट्टी यांचे वडील गोविंदस्वामी शेट्टी यांचे काल दिनांक 19 एप्रिल रोजी निधन झाले.उपचाराची गरज असतानाही ९ महिन्यांपासून पगारच नसल्याने पैशाअभावी घरच्या सदस्यांवर उपचार करता आले नाही.त्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले असा कामगारांचा आरोप आहे. किराणा दुकानदार,घरमालक, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी,मुलांच्या शाळेचे व्यवस्थापन या सर्वांच्या थकबाकीमुळे कामगार अक्षरशः तणावाखाली जगत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगार यांनी आज पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देऊन अधिष्ठता कार्यालयावर धडक दिली.

मागील तिन दिवसांपासून मुंबई येथुन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची एक चमू लेखाधिकारी आर.के. चव्हाण यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय दाखल झालेली होती. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलनातील कामगारांनी आज अचानक अधिष्ठाता कार्यालयावर धडक दिली व चौकशी समितीला घेरले. जोपर्यंत आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये देशमुख यांनी सर्व पुराव्यानिशी चौकशी समितीसमोर अधिष्ठाता कार्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा बुरखा फाडला. त्यानंतर दुपारी ४ वाजता चौकशी समितीचे प्रमुख वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई चे लेखाधिकारी आर.के.चव्हाण यांना शासकीय विश्रामगृह येथे भेटून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांचे बँक खाते व त्यांच्या नियुक्तीच्या पत्राची प्रत तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे देण्यात आले. यावेळी जनविकास कामगार संघाचे सतीश येसांबरे,अमोल घोडमारे व प्रमोद मांगळुरकर उपस्थित होते. थकीत पगारा बाबत लवकर निर्णय न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा देशमुख यांनी समितीला दिला.
एकीकडे संपूर्ण देशात कोविड योध्द्यांचा सन्मान केला जात आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर मध्ये सात महिने विनावेतन रुग्णांची सेवा करणाऱे कोविड योद्धे कामावर होते किंवा नाही याची वारंवार चौकशी करून त्यांचा अपमान केला जात आहे. उपासमारीची वेळ आलेल्या कोविड योध्द्यांच्या जखमेवर शासनाकडून मीठ सोडल्या जात असल्याचा आरोप यावेळी जनविकास चे अध्यक्ष देशमुख यांनी केला.