चंद्रपूर : चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, राजुरा येथे वायफायाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच निधी प्राप्त होऊन या शहरामध्ये ही सेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. दूरसंचार सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक एस. के. शाहू, पंकज भुजबळ, दीपक कांबळे, विस्वास काळे, दिनेश जयस्वाल, राजेश शेंडे, सचिन सरोदे, मिलिंद नागराळे, भास्कर कावळे, संदीप काळे, दीपक कत्रोजवार, प्रवीण महाजन यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात BSNL Mobile ची सेवा आणि सुविधा पोहचवावी. तसेच पावसाळ्यात बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाइल सेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. शैक्षणिक सत्र, बहुतांश शासकीय कामे, नोकरीचे फार्म आदी कामे ऑनलाइन झाल्याने ग्रामीण भागात Broad Band, 3G Internet सुविधा उपलब्ध करून द्यावी. जिवती तालुक्यातील कुंभेझरी कोडेपूर तसेच चिमूर तालुक्यातील, साठगाव येथे टॉवर लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केली. BSNL अद्याप २ जी व ३ जी सव्हिर्स देत आहे. दुसरीकडे खाजगी कंपनी ४ जी व ५ जी कडे वाटचाल करीत आहे.
त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला BSNL कमी पडताना दिसत आहे. परंतु हे चित्र फार वाईट आहे. येत्या काळात हे चित्र बदलविण्याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे.