• उपोषण मागे घेण्याचे केले आवाहन
• प्रदमुषनमुक्त व सुशोभिकरण या दोन भागात कामाचे विभाजन
• सात दिवसात अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश
चंद्रपूर : रामाळा तलावाच्या शुद्धिकरणाचे काम प्रदुषनमुक्त करणे व सुशोभीकरण करणे या दोन भागात विभागून त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक येत्या आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले असून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर लगेचच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच या तलावाच्या शुद्धिकरणासाठी पर्यावरण संघटनेचे बंडू धोत्रे यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.
आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदुषण नियामक मंडळाचे वरिष्ट अधिकारी अशोक शिंगारे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बंडू धोत्रे यांचेशी चर्चा केली. यावेळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,चंद्रपूर महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रामाळा तलावाच्या शुद्धीकरणासाठी स्थानीक प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. तलावात तीन छोटे व एका मोठ्या नाल्याचे सांडपाणी जमा होत असल्याने व मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्वप्रथम नाल्याचे पाणी दुसरीकडे वळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री ठाकरे यांनी ‘माझी वसुंधरा’ व पर्यटनासंदर्भात अधीवेशनानंतर लवकरच चंद्रपूर येथे बैठक घेणार असल्याचे सांगीतले यावेळी चंद्रपूर जिल्ह्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अधिक काय करता येईल त्याबाबत आढावा घेण्यात येईल. पर्यावरनाशी निगडीत संस्था व नागरिकांनी देखील समन्वयातून कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सत्याग्रहाच्या समर्थनार्थ 25 जणांनी केले आत्मक्लेश सामूहिक मुंडन
रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला सोमवारी आठ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाच्या समर्थनार्थ 25 जणांनी मुंङण केले.
मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी 25 जणांनी मुंङण केले. आत्मक्लेश सामूहिक मुंडन आंदोलनात स्वतः बंडू धोतरेसह इको प्रोचे नितीन बुरडकर, धर्मेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, हरिदास कोराम, सुमित कोहळे, अमोल उट्टलवार, कपिल चौधरी, हरीश मेश्राम, जयेश बैनलवार, सुनील मीलाल, दत्ता सरोदे, सचिन धोतरे, गौरव झोडे, सुनील पाटील, आशिष मस्के यांचा समावेश होता. या सत्याग्रहाला समर्थन व पाठिंबा देत महाराष्ट्र नाभिक संघटन चंद्रपूर यांनी सामूहिक मुंडन केले. यात रवी येसेकर, मशेष आंबेकर, रमेश चौधरी, प्रणिल वाटेकर, रोहित कडुकर, बंडू चौधरी, राजेश मालवीय, वासुदेव कडवे, जामुवंत निंबाळकर यांचा समावेश होता.
लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ ‘मानवी साखळी’
इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आठव्या दिवशी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत रामाला तलाव वाचविण्यासाठी ‘मानवी साखळी’ तयार केली. यावेळेस विद्यार्थिनींनी रामाळा तलावाचे प्रदूषण आणि भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.