शाळेवर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चार शिक्षकांची कार पडली खड्ड्यात, पाण्यामध्ये चौघांचाही गुदमरून मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

हिंगोली : दिशादर्शक फलक नसल्याने भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघात चार शिक्षकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. जिल्ह्यातील सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गावरील भानखेडा या गावाजवळ हा अपघात झाला आहे.

अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. लोणार तालुक्यातील पळसखेडा येथील हे शिक्षक आहेत. हे चारही शिक्षक शाळेवर रुजू होण्यासाठी जात असताना कार खड्ड्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

सेनगाव ते येलदरी व सेनगाव ते रिसोड या महामार्गाच्या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक न ठेवल्याने हा अपघात घ़डला आहे.

सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाही. त्यामुळे ही कार खड्ड्यात जाऊन पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन त्यातच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला.

खड्डयामध्ये वाहनाचा लाईट दिसत असल्याने काही गावकऱ्यांनी ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

याघटनेची माहिती मिळताच सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार अनिल भारती, शिदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले.