ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव रक्षणार्थ  सोमवारपासून पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांचे ‘अन्नत्याग सत्याग्रह’

0
22

चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला ‘रामाळा तलाव’ आज अतिक्रमणाने गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी सोमवार, 22 फेब्रुवारीपासून अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे.

वर्ष 2008 मध्ये रामाळा तलावात आलेली इकाॅर्नीया वनस्पती निर्मुलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासुन इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खोलीकरण व सौदर्यीकरण करीता तलाव प्रदुषीत होण्याची कारणे याचा अभ्यास करून वेळोवळी प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. मागील 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक बैठका आणि प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्यात. प्रत्येकवेळी तलावातील पाणी सोडण्याची वेळ आणि कामाचा कालावधी किवा निधीचे स्त्रोत आदी बाबीमुळे विलंब होऊन रामाळा तलाव खोलीकरणाचा मुद्दा पुढील वर्षावर जात आहे. मागील वर्षी तत्कालिन जिल्हाधिकारी डाॅ. कुनाल खेमणार यांच्या कार्यकाळात कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे ठरले होते. तलावातील पाणी सोडून तलावसुध्दा सुकविण्यात आलेला होता, असे असतानाही कोवीडमुळे काम होऊ शकले नाही. मात्र यादरम्यान मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेकोलिला देण्यात आलेल्या निर्देशानुसार वेकोलिमधून भुगर्भातील फेकले जाणारे पाणी शुध्दीकरण करून तलावात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामास वेकोलीकडून मंजुरी देण्यात आलेली होती. सदर काम पूर्णत्वास सुद्धा येत आहे. मात्र, अद्यापही सदर तलावात येणारे मच्छीनाला सांडपाणी वळती करणे, नाल्यावर शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलाव खोलीकरण संदर्भात कुठलीच पावले उचलली गेली नाहीत.

यांसदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, नव्याने जिल्हयाचा कार्यभार सांभळताच इको-प्रो तर्फे भेट घेउन रामाला तलाव बाबत यापुर्वी सुरू असलेले प्रयत्न बाबत माहीती देत रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने खोलीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांना भेटून रामाळा तलाव प्रदुषणाबाबत माहीती देण्यात आली. राज्य शासनाच्या ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत तलाव संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली होती.

मागील वर्षी तलावाचे खोलिकरणाकरीता प्रयत्न सुरू झालेले असतांना सुध्दा यंदा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने विलंब होत असल्याने आणि तलावातील मासे मृत होण्याइतपत प्रदुषण वाढीस लागल्याने इको-प्रो ने 27 जाने 2021 ला मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या दृष्टीने विवीध विभागांकडे आवश्यक मागण्या करीत इको-प्रो तर्फे आंदोलन-सत्याग्रहाच्या भूमिकेबाबत निवेदन देण्यात आलेले होते. मात्र यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक चर्चा करीत, रामाळा तलावाबाबत बैठकीचे आयोजन केले होते. त्यामुळे सदर आंदोलन 15 दिवस करिता स्थगीत करण्यात आले होते. मात्र, 15 दिवस लोटले असले तरी रामाला तलाव प्रदुषणमुक्त व खोलीकरण करण्याच्या दृष्टीने अद्याप पावले उचलली गेली नाहीत. तसेच तलाव खोलिकरणाच्या अनुषंगाने आर्थिक तरतुदसुध्दा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारी ला एकदिवसीय ‘बैठा सत्याग्रह’ करण्यात आलेला होता.

तलावाच्या कामास वेळेची गरज लक्षात घेऊन मागील ऑक्टोबर -नोव्हेबर 2020 पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. शहरातील एकमेव तलाव, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव, आज अतिक्रमणाखाली जात असतांना तलावाच्या संवर्धनाकरिता प्रशासनातर्फे पावले उचलली जात नाही आहे. सध्या फेब्रुवारी महीना पण संपत चाललेला आहे. रामाळा तलाव खोलीकरण करावयाचे असल्यास पुर्ण कामास लागणारा कालावधी गृहीत धरता प्रत्यक्ष कामास सुरूवात करणे आवश्यक आहे. रामाळा तलावाचे संवर्धनाची बाब गंभीरतेने घेत नसल्याने, तसेच तलावाच्या खोलीकरणाच्या कामास लागणारा पावसाळा पुर्वीचा वेळ पुरेसा राहणार नसल्याने, पुरेसा वेळ राखुनच कामाची सुरूवात करण्याची गरज असल्याने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाची भूमीका घेत असल्याचे इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी सांगितले.

● सर्वाधिक प्रदूषित शहरात आता रामाळा तलावामुळे जलप्रदूषणाने मासे मृत्यू व जलजीव धोक्यात

दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी रामाळा तलावाच्या काठावर अनेक मासे मृत अवस्थेत दिसून आले. इको-प्रोतर्फे जेव्हा पाहणी केली तेव्हा लक्षात आले की, तलावाच्या काठावर मागील काही दिवसापासुन मासे मृत होत आहेत. पाण्यातील कमी झालेले ऑक्सिजन चे प्रमाण यामुळे काठावर अनेक मासे येऊन मरत आहेत. यावरून तलावाचे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे. ऐतीहासीक गोंडकालीन वारसा असलेला रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्यास तलावाचे खोलीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तलावातील प्रदूषित पाण्याने परिसरातील ‘भूजल’ प्रदूषित

शहराच्या मधोमध असलेल्या या तलावामुळे परिसरात भूजल पातळी कायम राखली जाते. मात्र याच तलावातच मच्छिनाला चे संपूर्ण सांडपाणी येत असल्याने, ऐतिहासिक तलाव आता सांडपाणी जमा होण्याचे केंद्र झाले आहे. तलावातील प्रदूषित पाणीमुळे जमिनीत मुरत असल्याने भूजल सुद्धा दूषित झालेले आहे. परिसरातील नागरीकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

●अतिक्रमणात शहरातील 5 तलाव नष्ट, एकमेव तलाव सुद्धा अतिक्रमणाखाली

चंद्रपूर शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून अनेक तलावाचा वारसा सुद्धा होता. मात्र काळाच्या ओघात, एक-एक करीत ‘तुकुम तलाव’, बाबूपेठ चा ‘गौरी तलाव’, ‘घुटकाळा तलाव’, ‘लेंडारा तलाव’ आणि लालपेठ-मातानगर ला लागून असलेला ‘लाल तलाव’ ही सर्व इतिहास जमा झालेली आहेत. शहराच्या मधोमध असलेला एकमात्र 500 वर्ष पूर्वी गोंडराजें यांनी बांधकाम केलेला हा तलाव आपली शेवटची घटका मोजतोय, याकरिता पर्यावरण व इतिहास संवर्धनासाठी झटणारे इको-प्रो चे मावळे आता सत्याग्रह-आंदोलन करीत आहे.

●किल्ला व तलाव पर्यटन मुळे शहरातील स्थानिक पर्यटन विकास शक्य

इको-प्रो ने सलग 900 अधिक दिवस श्रमदान करीत शहरातील गोंडकालीन किल्ला परकोट स्वच्छ करीत, मागील दोन वर्षे पासून ‘हेरिटेज वॉक’ मधून शहरात किल्ला पर्यटन सुरू केले आहे. नागरिकांचा या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता ते पर्यटन यास कुठलीही आर्थिक मदत न घेता इको-प्रो हे करतेय हे विशेष! जर रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून खोलीकरण केल्यास किल्ला व तलाव पर्यटन चे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास शहरात नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मोठी संधी निर्माण होईल.

● अन्नत्याग सत्याग्रह च्या विविध विभागाकडे असलेल्या मागण्या

जिल्हा प्रशासनाकडे मागणी

१. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्यास तलावाचे खोलीकरण करणे.
२. खोलीकरण नंतर तलावाचे सौदर्यीकरण करून पर्यटन विकास करणे.
३. तलावाच्या दक्षिण दिशेकडील वडाच्या झाडापासुन उदयानात जाण्यास प्रस्तावीत पुलाचे बांधकाम करणे.
४. रामाळा उदयान निर्मीती वेळेस ‘एक देउळ ते बगड खिडकी’ असा पर्यटनदुष्टया विकसीत केलेल्या रोडचे पुर्ण-बांधकाम करणे.

चंद्रपुर महानगरपालीका कडे मागणी

१. रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे. तलावात येणारा मच्छीनाल्याचा प्रवााह वळती करणे.
२. मच्छीनाला जिथे तलावास येउन मिळतो तिथे ‘वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसवीणे.
३. तलावाच्या दोन्ही बाजुस असलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही याची व्यवस्था करणे.
४. तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
५. दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन कायमचे बंद करून इरई नदी पात्रालगत व्यवस्था करणे.
६. किल्ला परकोट पर्यटन व रामाळा तलाव पर्यटन क्लस्टर करीता जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पुरातत्व विभाग मिळुन सामुहीकरित्या आराखडा तयार करून त्यातील आवश्यक कामे करणे.

मध्य रेलवे विभागाकडे मागणी

१. लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात, त्यावर नियत्रंण आणणे.
२. इतर रेलवे स्थानकांप्रमाणे खते आणी धान्य पावसापासुन सुरक्षित राहण्यास मध्य रेल्वे ने बॅरेकचे बांधकाम करणे.
३. चंद्रपूर रेलवे स्टेशन ते रामाळा उदयान लगतच्या रेलवे फाटकापर्यतचा रेलवे ट्रॅकला समांतर प्रलंबीत रस्त्याचे बांधकाम पुर्ण करणे.

वेकोली यांचेकडे मागणी

१. खोलीकरणानंतर वेकोली चे सातत्याने भुगर्भातील सातत्याने फेकण्यात येत असलेले पाणी तलावात आणणे.

प्रदुषण नियत्रंण मंडळाकडे मागणी

१. रामाळा तलावातील प्रदुषणाचे स्त्रोतांचा अभ्यास करून तलावाचे पर्यावरण अबाधित ठेवण्यास संबधीत विभागांना बंधनकारक करणे.

भारतीय पुरातत्व विभागाकडे मागणी

१. रामाळा तलावाच्या पुर्वेकडे असलेल्या तुटलेल्या तलावाच्या भिंतीचे बांधकाम करणे.
२. रामाळा तलावाच्या आतुन चंद्रपूर किल्ला परकोटाच्या भिंतीस लागुन असलेल्या झाडी-झुडपे, वाढलेली वृक्ष काढुन किल्ला ंिभंतीचे संरक्षण करणे.
३. एक देउळ ते बगड खिडकी पर्यत किल्ल्यास लागुन संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
४. एक देउळ ते बगड खिडकी दरम्यान किल्लाच्या भिंतीची दुरस्ती करणे.
५. बगड खिडकी ते रामटेके वाडी पर्यत ‘हेरीटेज वाॅक’ मार्गामधील किल्ला भिंतीेचे दरम्यान पुर्णबांधकामाची कामे पुर्ण करणे.
६. बगड खिडकी ते मसन खिडकी दरम्यान किल्ला परकोट भिंत व संरक्षण भिंतीच्या मध्ये पाथ वे, सायकल ट्रेक करीता दगडाची फरसबंदीचे काम करणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here