केंद्र सरकारने यंदा म्हणजे 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत तब्बल 69 वेळा इंधन दरवाढ करून 4 लाख 91 हजार कोटी रूपये कमावले आहेत असा दावा लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी केला आहे.
या दरवाढीतून सामान्य माणूस पिचला गेला आहे. त्यांना दिलासा दिली गेला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. छत्तीसगडच्या कॉंग्रेस सरकारने इंधनावरील व्हॅट काढून टाकून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. तसा दिलासा पश्चिम बंगालनेही द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्तीसगड सरकारने व्हॅट काढून टाकल्याने तेथील पेट्रोलचा दर 12 रूपयांनी कमी झाला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की सर्वच प्रकारच्या महागाईने सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. सगळीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून गॅस सिलिंडरचे दरही 850 रूपयांपर्यंत गेले आहेत.
पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट काढून टाकल्यास राज्याला तेराशे ते चौदाशे कोटी रूपयांचा तोटा येईल पण ज्या सरकारला राज्यातील जनतेने इतक्या प्रचंड बहुमताने जिंकून दिले आहे की त्यासाठी त्यांना हा खर्च सहज परवडण्यासारखा आहे असे ते म्हणाले.