24 तास लोटून सुद्धा ते दोन मृतदेह अनोळखीच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

धानोरा येथील घटना, चर्चेला उधाण

चंद्रपूर : सततधार पाऊस पडल्याने घुग्घुस येथून जवळच असलेल्या धानोरा गावा जवळील वर्धा नदीला ओसंडून पुर आला होता. शनिवारी रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान धानोरा येथील वर्धा नदीच्या काठावर दोन मृतदेह एका झाडाला अडकलेले आढळले त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

धानोरा – गडचांदूर पुलावरून पाणी चार फूट ओसंडून वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे वर्धा नदीच्या पुराच्या प्रवाहात एका महिलेचा व एका पुरुषाचा मृतदेह वाहून येत वर्धा नदीच्या काठा जवळ एका झाडाला अडकला.

धानोरा येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच नदी काठच्या शेतात काम करणाऱ्या नागरिकांना हे दोन मृतदेह नदीच्या पात्रा जवळ अडकून दिसताच घुग्घुस पोलिसांना ही माहिती देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलिसांनी पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदणासाठी चंद्रपूर येथे पाठविला.

घुग्घुस पोलिसांनी मर्ग दाखल केला परंतु चोवीस तासाचा कालावधी लोटून सुद्धा या दोन मृतदेहांची ओळख पटविण्यात मात्र घुग्घुस पोलिसांना अपयश आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवाला नंतर मृत्यूचे नेमके कारण कोणते हे कळणार आहे. सध्या तरी तर्कवितर्क लावण्यात येत असून चर्चेला उधाण आले आहे.